Monday, July 27, 2015

योजना कर्मचाऱ्यांचा विश्वासघात

- हेमलता
अनुवाद: शुभा शमीम

सबका साथ, सबका विकासच्या मोठमोठ्या वल्गना करणाऱ्या भाजप सरकारने प्रत्यक्षात मात्र २०१५-१६च्या अर्थसंकल्पात समाज कल्याणावरील खर्चात प्रचंड कपात करून आपले जनविरोधी चरित्र उघड केले आहे. अनेक केंद्र पुरस्कृत योजनांवरील निधीमध्ये कपात झाली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आयसीडीएस) ही केंद्र पुरस्कृत योजना आज जवळ जवळ ४० वर्षे राबवली जात आहे. त्यासाठी दिला जाणारा निधी जरी पुरेसा नसला तरी आत्तापर्यंत कायम वाढतच गेलेला होता. या वर्षी प्रथमच त्यात ५० टक्क्यांपेक्षाही जास्त अशी प्रचंड कपात करण्यात आली. २०१४-१५च्या बजेटमध्ये आयसीडीएससाठी १८३९१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता, २०१५-१६ मध्ये तो ८७५४ कोटी रुपयांपर्यंत खाली आणला गेला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानावरील निधीतही ३९०० कोटी रुपयांची कपात करण्यात आली. सर्व शिक्षा अभियानाच्या निधीतही २०१४-१५ मधील २७७५८ कोटींवरून २२००० कोटी तर शालेय मध्यान्न भोजन राष्ट्रीय कार्यक्रमासाठीच्या निधीत १३२१५ कोटींवरून ९२३६ कोटी रुपयांपर्यंत घसरण झाली.       
महत्वाच्या केंद्र पुरस्कृत योजनांवरील निधीत झालेल्या या प्रचंड कपातीमुळे त्या योजनांच्या लाभार्थ्यांच्या व विशेषत: महिला व बालकांच्या पोषण, आरोग्य आणि साक्षरतेच्या स्थितीवर गंभीर परिणाम होणार आहेत. ह्यात प्रामुख्याने असंघटित क्षेत्रातील कामगार, शेतमजूर, लहान व अल्पभूधारक शेतकरी अशा समाजातील गरीब थरातील कुटुंबांमधील महिला व बालकांचा समावेश आहे. त्यातील बहुसंख्य लोक अनुसुचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय या सामाजिक दृष्ट्या मागास विभागांमधून येतात.  
समाज कल्याणाच्या योजनांवरील निधीत निर्दयीपणे कपात करणारे सरकार गरिबांसाठी काही योजनांची घोषणा करून स्वत:ला गरिबांचा वाली म्हणवून घेत आहे, ज्या योजनांसाठी त्यांना स्वत:चा एकही पैसा न खर्च करावा लागणार नाही. हा एक विरोधाभासच नाही काय? प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजना या सारख्या मोठ्या धामधुमीत घोषित केलेल्या योजना, ज्या गरिबांसाठीच्या कल्याणकारी योजना म्हणून मिरवल्या जात आहेत, त्या सर्व कामगारांच्याच योगदानावर चालणाऱ्या योजना आहेत. एका बाजूला आज अस्तित्वात असलेले कल्याणकारी लाभ काढून घेत असताना असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठीच काम करीत असल्याचा सरकारचा दावा खरोखरच हास्यास्पद वाटतो.       
योजना कर्मचाऱ्यांचा विश्वासघात
निधीमध्ये कपात केलेल्या आघाडीचे कार्यक्रम म्हणून गणल्या गेलेल्या अनेक योजनांमध्ये लाखो कर्मचारी आणि त्यातही बहुसंख्येने महिला कर्मचारी काम करतात. निधीमधील कपातीमुळे त्यांच्यावर फार मोठा आघात झाला आहे.  
आयसीडीएसमध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, शालेय विद्यार्थ्यांसाठी मध्यान्न भोजन शिजवणारे कामगार, राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या आशा, सर्व शिक्षा अभियानात काम करणारे शिक्षण सेवक या सर्वांना या सरकारकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या. त्यांना अशी आशा होती की हे सरकार त्यांच्या किमान वेतन, सामाजिक सुरक्षा आणि कामाची चांगली परिस्थिती यासारख्या मूलभूत मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देईल. अंगणवाडी कर्मचारी त्यांच्या खूप काळ प्रलंबित असलेल्या मानधनवाढ आणि पेन्शन या मागण्यांबाबत अर्थमंत्री काहीतरी घोषणा करतील याची आतुरतेने वाट पहात होत्या. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी सुद्धा भाजप सरकार या बजेटमध्ये ३००० रुपये मानधनाची घोषणा करेल अशी अपेक्षा केली होती. आशांना देखील त्यांना किमान काही निश्चित मासिक मानधन मिळेल अशी आशा होती. पण यापैकी काहीच घडले नाही.     
ह्या योजनांसाठीचा निधी वाढवला असता तर हे सर्व शक्य झाले असते. पण मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने त्याऐवजी या सर्व योजनांच्या निधीमध्ये मोठी कपात लादली. त्यांनी केंद्र पुरस्कृत योजनांच्या एकूण संख्येतही खूप मोठी कपात केली आहे. फक्त इतकेच नाही तर राज्य, केंद्राने उचलायच्या निधीच्या प्रमाणातही बदल केला गेला आहे. हे सर्व राज्यांना जास्त निधी वर्ग करण्याच्या १४व्या वित्त आयोगाच्या शिफारसीच्या बहाण्याने केले जात आहे. राज्य सरकारांना केंद्र पुरस्कृत योजनांवर जास्त खर्च करायला सांगितले जात आहे.   
भाजप सरकारने एकतर्फी उचललेल्या ह्या पावलांच्या माध्यमातून ह्या योजनांचे लाखो कर्मचारी व कोट्यावधी लाभार्थ्यांबद्दलची त्यांची उपेक्षाच दिसून येते. फक्त अंगणवाडी कर्मचारी, आशा आणि शालेय पोषण आहार कर्मचारीच नाही तर राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विविध राज्यांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानात काम करणारे आयकेपी अॅनिमेटर/ शक्ती सहायिका, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सी (एटीएमए) मधील कृषक साथी/ रयत मित्र, सर्व शिक्षा अभियानातील शिक्षण सेवक इत्यादी विविध नावांनी काम करणाऱ्या योजना कर्मचाऱ्यांकडे सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.     
यातील अनेक योजना गेल्या २,३ दशकांपासून अस्तित्वात आहेत. या कालावधीत लाखो कर्मचाऱ्यांनी तळागाळात अहोरात्र काम केले आहे. आज भारत सरकारच्या विविध योजनांमध्ये सुमारे एक कोटी कर्मचारी काम करत आहेत. पण केंद्रात आणि राज्यांमध्ये लागोपाठ सत्तेत आलेल्या सरकारांनी त्यांना साधे कर्मचारी म्हणून मान्यता द्यायलाही नकार दिला आहे यावर विश्वास बसत नाही पण हे खरे आहे. सरकार त्यांच्या भरतीसाठीचे निकष ठरवते व निवड करते. सरकार त्यांना कामे ठरवून देते, त्या कामांसाठी सरकारच त्यांना मोबदला देते, सरकारच त्यांच्या कामाचे निरिक्षण व परिक्षण करते, देखरेख ठेवते, सरकार त्यांनी चूक केल्यास शिस्तभंगाची कारवाई करते. पण त्यांना कामगार किंवा कर्मचारी म्हणून मान्यता मात्र देत नाही. त्यांना वेतन व अन्य लाभांपासून वंचित ठेवण्यासाठीच त्यांना अशी विविध भपकेदार नावे देण्याची फसवी युक्ती सरकारने शोधून काढली आहे. म्हणूनच अंगणवाडी सेविका, मदतनीस, शालेय पोषण आहार कर्मचारी, राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इत्यादींना समाज सेवक, राष्ट्रीय आरोग्य अभियानातील आशांना कार्यकर्ती आणि इतरांना मित्र, पाहुणे, स्वयंसेवक, यशोदा, ममता म्हटले जाते.       
त्यांना दिलेल्या मोबदल्याला वेतन नाही तर मानधन किंवा प्रोत्साहन भत्ता म्हटले जाते. अनेक अंगणवाडी कर्मचारी २ ते ३ दशकांपासून काम करीत आहेत पण इतक्या वर्षांच्या अनुभवानंतरही सेविकांना मिळणारे मानधन सरकारने निर्धारित केलेल्या किमान वेतनाच्या अर्धे देखील नाही. मदतनिसांना तर किमान वेतनाच्या पाव हिस्साच मानधन मिळते. अंगणवाडी केंद्रात आपले आयुष्य घालवल्यानंतर वयाची साठी, पासष्ठी उलटल्यावर त्यांना कोणत्याही पेन्शन किंवा निवृत्ती लाभाशिवायच घरी बसावे लागत आहे. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना आत्ता कुठे महिन्याला १००० रुपये मानधन देण्याची सुरवात केली पण तेही वर्षातून फक्त १० महिन्यांसाठी दिले जातात. आशांसाठी आशा फक्त त्यांच्या नावातच उरली आहे. त्यांना अंगणवाडी किंवा शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांसारखे निश्चित मानधनही दिले जात नाही. त्यांना जे काही मिळते त्याला प्रोत्साहन भत्ता म्हटले जाते. अनेकदा त्यांना स्वत:च्या मुलांना वाऱ्यावर सोडून बाळंत होणाऱ्या महिलेसोबत रात्री अपरात्री रुग्णालयात जावे लागते. इतके करूनही त्यांना ठरलेला अल्प प्रोत्साहन भत्ता देखील या ना त्या बहाण्याने नाकारला जातो. आजही अनेक राज्यांमध्ये निधीच्या कमतरतेच्या नावाखाली अनेक योजना कर्मचाऱ्यांचे मानधन किंवाप्रोत्साहन भत्ता ७, ८ महिन्यांपर्यंत थकवले जाते.                
याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानात काम करणारे आयकेपी अॅनिमेटर/ शक्ती सहायिका, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सी (एटीएमए) मधील कृषक साथी/ रयत मित्र आदींना सरकारच्या निर्देशांनुसार काम करावे लागत असूनही सरकारकडून एकाही पैशाचा मोबदला मिळत नाही. त्यांना लाभार्थ्यांकडूनच उपभोक्ता शुल्क गोळा करावे लागते.   
या योजनांमध्ये काम करण्यात आपले संपूर्ण आयुष्य घालवणाऱ्या योजना कर्मचाऱ्यांना भारत सरकार पेन्शन, ग्रॅच्युइटी किंवा कोणतीही दुसरी सामाजिक सुरक्षा देत नाही. सरकारसाठी योजना कर्मचारी म्हणजे फक्त वापरा आणि फेका वस्तू आहेत, जणू ती हाडामांसाची माणसे नाहीतच!
आधी उल्लेख केल्याप्रमाणे बहुसंख्य योजना कर्मचारी महिला आहेत. समाजाच्या महिलांच्या कामाबाबत असलेल्या दृष्टिकोणाचा सरकार त्यांचे शोषण करण्यासाठी पुरेपूर वापर करून घेत आहे. आजच्या समाजात कुटुंबाला अन्न पुरवणे, मुलांचे संगोपन करणे, कुटुंबातील आजारी व वृद्ध सदस्यांची देखभाल करणे ह्या सर्व महिलांच्या जबाबदाऱ्या समजल्या जातात. ह्या सर्व योजनांमधून सरकारने महिलांनी करावयाच्या याच विना मोबदला कौटुंबिक कामांचा, काहीच मोबदला न घेता किंवा अल्प मानधनात, समाज सेविका म्हणून समाजासाठी करावयाच्या कामांमध्ये विस्तार केला आहे. सरकार देशात असलेल्या बेरोजगारी किंवा अर्ध बेरोजगारीच्या परिस्थितीचा आणि किमान काहीतरी उत्पन्न मिळवण्याच्या गरीब महिलांच्या गरजेचा, अशा दयनीय परिस्थितीत काम करायला त्यांना भाग पाडण्यासाठी निर्लज्जपणे वापर करून घेत आहे.         
ह्या कमी मोबदल्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या ओझ्यात मात्र सातत्याने वाढ होत आहे. भरती अभावी निर्माण झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी अनेक योजनाबाह्य कामे आणि त्यांच्या अनुषंगाने येणाऱ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर लादल्या जातात. ती कामे करण्यास त्यांनी नकार दिल्यास त्यांना त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतील अशा धमक्या दिल्या जातात. ह्यामुळे कर्मचाऱ्यांवरचे विना मोबदला कामाचे ओझेच फक्त वाढते असे नाही तर त्यांच्या मूळ योजनेच्या कामकाजावरही त्याचा परिणाम होतो. पण सरकारला त्याची अजिबात पर्वा नाही.     
ह्यापैकी अनेक योजनांमधील कर्मचारी, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, वेतनश्रेणी, किमान वेतन, पेन्शन आणि कामाच्या चांगल्या परिस्थितीसाठी राष्ट्रीय पातळीवर तसेच अनेक राज्यांमध्ये लढा देत आहेत. यातील अनेक लढे ऐतिहासिक आणि अनुकरणीय होते. हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोठमोठे मोर्चे काढून देशाची राजधानी दणाणून सोडली. देशभरातील लाखो योजना कर्मचारी देशव्यापी संपात सहभागी झाले, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जेल भरो आंदोलन केले, त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ लाभार्थ्यांसहित कोट्यावधी लोकांच्या सह्या गोळा केल्या आणि पंतप्रधानांना त्या सह्यांचे निवेदन दिले.     
शालेय पोषण आहार कर्मचारी आणि आशांनी देखील आपल्या परिस्थितीत सुधारणा करण्याची मागणी घेऊन अनेक वेळा दिल्लीत निदर्शने, धरणे आयोजित केले. पूर्ण देशभर हजारो शालेय पोषण आहार कर्मचारी वेगवेगळ्या आंदोलन व लढ्यांमध्ये सहभागी झाले. त्यांच्या शिष्ठमंडळांनी किती तरी वेळा संबंधित मंत्र्यांची भेट घेतली. परंतु पुन्हा पुन्हा तीच तीच आश्वासने देण्यापलीकडे त्यांनी काहीच ठोस पाऊल उचलले नाही. सरकार खाजगी शाळांना प्रोत्साहन देत आहे आणि सरकरी शाळांकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. काही राज्यांमधल्या सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट होत आहे. पोषण आहार कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केले जात आहे. निश्चित मानधनाची मागणी घेऊन हजारो आशांनी देशाच्या राजधानीत आणि अनेक राज्यांमध्ये निदर्शने केली. बहुतेक राज्यांमध्ये आशांना दर महिन्याला निश्चित अशी रक्कम देण्याचे आश्वासन अजूनपर्यंत तरी अंमलात आणले गेलेले नाही.   
इतर सरकारी खात्यांमधल्या योजना कर्मचाऱ्यांची हकीकत काही वेगळी नाही. हे सर्व योजना कर्मचारी भावी मनुष्यबळाचा म्हणजेच आपल्या देशाची बालके व त्यांना जन्म देणाऱ्या महिला यांचा विकास करण्यासाठी महत्वाचे योगदान देतात. त्यांचा विकास करण्यासाठी आवश्यक असलेल्या पूरक पोषक आहार, शिक्षण, आरोग्य सेवा, व्यावसायिक प्रशिक्षण इत्यादी सेवा देतात. अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, आशा, राष्ट्रीय बाल कामगार प्रकल्पांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांच्या अथक प्रयत्नांमुळे कुपोषण, बाल व माता मृत्यू दर, शाळा गळतीचे प्रमाण, बाल कामगारांना शाळेत घालून मुख्य धारेत आणणे इत्यादी गंभीर समस्यांची तीव्रता कमी करण्यात यश आलेले आहे.     
ह्याच पार्श्वभूमीवर सिटूचा पुढाकार व अन्य केंद्रीय कामगार संघटनांच्या पाठिंब्यामुळे योजना कर्मचाऱ्यांचा प्रश्न भारतीय श्रम परिषदेच्या (आयएलसी) विषयपत्रिकेत आणण्यात यश आले. मे २०१३ मध्ये झालेल्या ४५व्या भारतीय श्रम परिषदेच्या विषयपत्रिकेत पहिल्या क्रमांकावर योजना कर्मचाऱ्यांचा विषय घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली. ४५व्या आयएलसीने एकमताने पुढील शिफारसी केल्या आहेत. 
·         सर्व योजना कर्मचारी, ज्यांना समाज सेविका, स्वयंसेविका, कार्यकर्ती, मित्र, पाहुणे अशा विविध नावांनी संबोधिले जाते, त्या सर्वांना कर्मचारींप्रमाणे वागविण्यात यावे.
·         त्यांना किमान वेतन द्यावे.
·         त्यांना सामाजिक सुरक्षा लाभ देण्यात याव्या.
·         या योजनांचे खाजगीकरण करण्यात येऊ नये.
या शिफारसींची अंमलबजावणी करण्यात पूर्वीचे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संपुआ सरकार असो वा आत्ताचे भाजपच्या नेतृत्वाखाली चालणारे रालोआ सरकार, कुणीही कोणतीही पावले उचलली नाहीत वा पुढाकारही घेतलेला नाही. सरकार शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे मानधन २०१५पर्यंत टप्प्या टप्प्याने ३००० रुपयांपर्यंत वाढवेल या ४५व्या आयएलसीत आलेल्या केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या प्रतिनिधींनी दिलेल्या ठोस आश्वासनाचे पालन करण्यासाठी देखील काहीच पावले उचललेली नाहीत. निवडणुकांपूर्वी भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तींचा आढावा घेतला जाईल व त्यांच्या मानधनात वाढ करण्यात येईल असे वचन दिले होते. पण सत्तेत आल्यानंतर मात्र भाजपने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.      
४५व्या आयएलसीच्या शिफारसी नाकारण्यासाठी व ४६व्या आयएलसीत त्यांचा कृती अहवाल मांडण्याच्या बाबतीत सध्याचे भाजप सरकार अत्यंत खालच्या पातळीवर गेले आहे. महिला व बाल विकास आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, मानव संसाधन विकास मंत्रालयाचे शालेय शिक्षण व साक्षरता विभाग यांनी या शिफारसींचे पालन करण्यामधली त्यांची असमर्थता अधिकृतरित्या दर्शवत हे कारण दिले आहे की योजना कर्मचारी हे अर्धवेळ स्वयंसेवी कर्मचारी आहेत. सरकार तसेच मालकांच्या व कामगारांच्या संघटना या तिन्ही भागिदारांनी एकमताने केलेल्या ४५व्या आयएलसीतील शिफारसींना नाकारून सरकारने आपल्या अहंकाराचेच प्रदर्शन केले आहे. कर्मचाऱ्यांना ६ ते ८ तास, ते ही त्यातील काहींना कधी कधी रात्री अपरात्री काम करावे लागते तरी त्यांना अर्धवेळ कर्मचारी म्हटले जाते याचा अर्थ काय? त्यांच्या कामाला स्वयंसेवी हे विशेषण कुणी जोडले? याला कर्मचारी जबाबदार आहेत काय? त्यांना जोडलेलीसामाजिक, स्वयंसेवी ही विशेषणे काढून टाकून त्यांना कर्मचाऱ्यांप्रमाणे वागवणे आणि वेतन देणे सरकारच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेरचे आहे काय? हे करण्यापासून सरकारला कोणी रोखले आहे? उत्तर स्पष्टच आहे. ह्या सरकारमध्ये किंवा मागच्या सरकारमध्ये त्यासाठी लागणारी रायकीय इच्छाशक्ती नव्हती आणि नाही हेच खरे. ते खरी खरी उत्तरे का देत नाहीत? कारण सत्तेत येण्यासाठी आणि ती कायम राखण्यासाठी त्यांना या सर्व योजना कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या लाभार्थ्यांच्या मतांची गरज असते. येन केन प्रकारेण गरिबांची मते मिळवून सत्तेत यायचे आणि सत्तेत आल्यानंतर धनिकांची गुलामी करायची हाच तर त्यांचा मंत्र आहे. कधीपर्यंत आपण हे चालू देणार?          
या योजनांवरील निधीमध्ये कपात म्हणजेच त्यातील सेवांमध्ये कपात. याचाच अर्थ आहे केवळ ह्या योजनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची उपजीविका धोक्यात घातली जात नाहिये तर या देशातील महिला व बालकांच्या पोषण, शिक्षण, आरोग्याच्या स्थितीत या आधीच्या काळात जी काही प्रगती झाली त्या प्रगतीलाच खीळ घातली जात आहे.
संयुक्त राष्टसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेनी (एफएओ) नुकताच जगातील अन्न असुरक्षेची स्थिती हा अहवाल प्रकाशित केला. ह्या अहवालानुलार भारतात अजूनही १९.४ कोटी लोक कुपोषित आहेत. ही जगातील सर्वात मोठी संख्या आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये प्रभावी आर्थिक विकास होऊन देखील भारत या सहस्त्रकातील विकासाची उद्दीष्ट्ये आणि जागतिक अन्न परिषदेचे लक्ष्य पूर्ण करण्यात अयशस्वी झाला आहे. एफएओच्या अभ्यासाने हे दाखवून दिले आहे की वाढती आर्थिक वाढ वाढत्या अन्न वापरात पूर्णपणे परावर्तित होतेच असे नाही तसे न होण्याचे कारण म्हणजे ही वाढ सर्वसमावेशक नव्हती. अहवालानुसार अन्न आणि इंधनाचे वाढते दर, वाढती बेरोजगारी आणि अर्ध बेरोजगारी, अस्वच्छता, रोगराई, स्वच्छ पाण्याची मर्यादित उपलब्धता ह्या गोष्टी देखील कुपोषणात भर घालत असतात.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आयसीडीएस), मध्यान्न भोजन कार्यक्रम (एमडीएम), राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) आणि राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान हे सर्व असे कार्यक्रम आहेत जे अगदी ह्याच समस्या हाताळतात. आयसीडीएस, एमडीएम, एनएचएम यांचे मूल्यांकन अनेकदा सरकारी आणि बिगर सरकारी स्वतंत्र संस्थांनी केले आहे. महिला व बालकांच्या पोषण, आरोग्य व साक्षरतेची स्थिती सुधारण्यात त्यांना यश येत असल्याचे सिद्ध झाले आहे. अंगणवाडी केंद्रांच्या परिसरात कमी वजनाच्या बालकांचा जन्म होण्याचे प्रमाण, तीव्र कुपोषण, अर्भक मृत्यू दर, शाळा गळतीचे प्रमाण आदींमध्ये घट झाल्याचे तसेच लसीकरण, शाळा भरती आदींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येते. मध्यान्न भोजन कार्यक्रमामुळे शाळा गळतीचे प्रमाण कमी होऊन शालेय विद्यार्थ्यांच्या कामगिरीत सुधारणा झाल्यामुळे बालकांमधील जातीय व अन्य सामाजिक दरी कमी होऊन त्यांच्यात अधिक समानता निर्माण झाल्याचे आढळून आले आहे. एनएचएममुळे संस्थात्मक बाळंतपणाच्या प्रमाणात वाढ होऊन माता मृत्यू दर कमी झाल्याचे आढळून आले आहे. ह्या योजनांनी दिलेल्या सेवांचे लाभार्थ्यांनी देखील कौतुक केले आहे.
सरकारची जर लोकांची परिस्थिती सुधारण्याला, त्यांच्याच सब का विकास या घोषणेला खरोखरच बांधिलकी असती तर सरकारने सर्व जनतेचा अधिकार म्हणून त्यांना या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलली असती, फक्त काही योजनांच्या माध्यमातूनच त्या दिल्या नसत्या, ज्या कधीही बंद करता येतात किंवा त्यांची काटछाट करता येते. सरकारने त्या योजनाना जास्त परिणामकारक बनवले असते आणि त्या सेवा तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या कर्मचाऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी देखील काहीतरी केले असते. हे सर्व करण्यासाठी जास्त निधी उपलब्ध करून दिला असता. पण जे भाजप सरकार जागतिक बँकेच्या व्यवसाय करण्याच्या सहजतेच्या निर्देशांकाच्या शिडीत वर चढायच्या स्पर्धेला इतके महत्व देत आहे की त्यांना आपल्या देशाच्या आधीच खाली असलेल्या मानवी विकास निर्देशांकात अजूनच घसरण होण्याच्या धोक्याची अजिबात पर्वा नाही. त्यांच्यासाठीच्या आर्थिक तरतुदीत वाढ करण्याऐवजी त्यांनी त्यामध्ये प्रचंड कपात करण्याचे धोरण अवलंबले आहे.
आर्थिक तरतुदीमधील या भयंकर कपातीमुळे ह्या योजनांच्या भविष्यावर अनिश्चिततेचे सावट आले आहे. भाजप सरकारने १४व्या वित्तीय आयोगाच्या शिफारसीनुसार राज्यांना वर्ग करायच्या निधीमध्ये वाढ केल्याचे निमित्त पुढे करून योजनांच्या आर्थिक तरतुदींमधील कपातीचे समर्थन केले आहे. राज्य सरकारला मिळालेल्या वाढीव निधीमधून त्यांनी योजनांच्या अंमलबजावणीसाठी जास्त खर्च करावा म्हणजे ते या केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीची जास्त चांगली जबाबदारी घेतील असा युक्तीवाद केला जात आहे.                   
शासनाची लोकांना सामाजिक सुरक्षा लाभ देण्याच्या जबाबदारीतून माघार हा नवउदार धोरणांचाच एक भाग आहे. ह्याची सुरवात नवउदार धोरणांच्या आपल्या देशातील आगमनाबरोबरच झाली. केंद्रात लागोपाठ आलेल्या सरकारांनी आयसीडीएसला स्वयंसेवी संस्था, माता समिती, बचत गट आणि पंचायत आदींकडे सोपवून खाजगीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या चळवळीने आयसीडीएसचे खाजगीकरण करण्याच्या, त्याला कमजोर करण्याच्या किंवा पूर्णपणे मोडकळीस आणण्याच्या वारंवार होणाऱ्या प्रयत्नांच्या विरोधात अनेक वेळा आंदोलन केले आहे. आहार बनविण्याचे व वितरित करण्याचे कंत्राट इस्कॉन, अक्षय पात्र आणि नांदी फौंडेशन सारख्या बड्या कॉर्पोरेट स्वयंसेवी संस्थांना देण्याच्या कारस्थानाविरुद्ध शालेय पोषण आहार कर्मचारी सातत्याने लढा देत आहेत. सामजिक सहभागाच्या नावाखाली या योजनांमध्ये वेदान्ता, जेपी, एअरटेल या सारख्या बड्या कॉर्पोरेट कंपन्यांना गुंतवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आशांना प्रॉक्टर अँड गँबल सारख्या कंपनीच्या वस्तू विकण्यासाठी वापरण्याचा प्रयत्न केला जात आहे. बड्या शैक्षणिक संस्थांना ३ ते ६ वयोगटाच्या बालकांना पूर्व प्राथमिक शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. सरकार लोकांना पोषण, आरोग्य आणि शिक्षणाची मूलभूत सेवा देण्याच्या आपल्या जबाबदारीतून माघार घेत आहे आणि त्या क्षेत्रात सेवा देण्याच्या नावावर खाजगी कंपन्यांना देशाच्या काना कोपऱ्यात आपले पंजे पसरवून गरीब लोकांकडून प्रचंड नफा कमवण्याची संधी देत आहे.               
योजना कर्मचाऱ्यांच्या उपजीविकेवरच फक्त प्रचंड संकट कोसळणार आहे असे नाही तर बालकांचे व महिलांचे अधिकार आणि सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाच्या तसेच आरोग्य, पोषण, शिक्षणाशी संबंधित मानवी विकासाच्या सेवांवर सुद्धा टप्प्या टप्प्याने घाला घातला जाणार आहेत. समाज कल्याण सुद्धा बाजारात खरेदी विक्री करण्याची वस्तू बनणार आहे. केंद्रातील सध्याच्या भाजप सरकारने या घातक प्रक्रियेला अजूनच जास्त गती दिली आहे.    
नवउदार धोरणांना असलेल्या आपल्या घट्ट बांधिलकीमुळेच भाजप सरकारने २०१४ मध्ये सत्ता काबीज केल्यापासून हे घातक प्रयत्न तीव्र केले आहेत. सत्ता काबीज केल्याबरोबर लगेचच त्यांनी योजना आयोग संपवला. योजना आयोगाच्या कामकाजात अनेक त्रुटी होत्या यात काही शंका नाही. परंतु केंद्र पुरस्कृत योजनांना निधी देण्याचे काम त्याचेच होते. आयोगच त्यांचे नियमित मूल्यांकन करून त्यांना पुढे सुरु ठेवण्याचा निर्णय घेत होता. आयोगच गरीब व मागासलेल्या राज्यांना विशेष दर्जा देऊन त्यांना विकासासाठी अतिरिक्त निधी देण्याचा निर्णय घेत होता. आयोगच राज्यांमधल्या मानवी विकासावर व महिला, अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमातीच्या उपयोजना इत्यादींवर देखरेख ठेवत होता. सरकारने योजना आयोगाच्या जागी आणलेल्या भारत सरकारचा वैचारिक साठा असलेल्या निती आयोगाकडे (National Institute of Transforming India) या कामाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या नाहीत. ह्या निती आयोगाला केंद्र पुरस्कृत योजनांबाबत शिफारसी देण्यासाठी विचारणा केली गेली. त्या चालू ठेवाव्यात, बंद कराव्यात की राज्यांकडे सुपूर्त कराव्यात हे विचारले गेले. केंद्र पुरस्कृत योजनांची संख्या कमी करण्याची त्यांनी शिफारस केली आहे.        
परंतु निती आयोगाने आपल्या शिफारसी देण्याच्या आधीच म्हणजे २०१५-१६च्या केंद्रीय बजेटमध्येच भाजप सरकारने केंद्र पुरस्कृत ६३ योजनांपैकी ८ योजना बंद करण्याची आणि आयसीडीएस, केंद्र व राज्यांनी एनएचएम व एनआरएलएम इत्यादी सहित २४ योजनांच्या निधीचा वाटा उचलण्याची पद्धत बदलण्याची घोषणा केली. मध्यान्न भोजन कार्यक्रम, सर्व शिक्षा अभियान इत्यादी योजनांच्या निधीचा वाटा उचलण्याची पद्धत सध्यातरी तशीच कायम ठेवण्यात आली आहे.     
निधीचा वाटा उचलण्याच्या ह्या बदललेल्या पद्धतीनुसार राज्यांना या २४ केंद्र पुरस्कृत योजनांवर जास्त खर्च करावा लागणार आहे. २०१५-१६ चे बजेट हे स्पष्टपणे मांडते की ह्या योजनांचा महसुली खर्च आता राज्य सरकारांना उचलावा लागणार आहे. केंद्र सरकार फक्त भांडवली खर्च करणार आहे. याचा अर्थ आहे की योजनांवरील पगार/ वेतन, भाडे आणि इतर रोजचे खर्च या खर्चांचा संपूर्ण भार राज्य सरकारला उचलावा लागणार आहे. केंद्र सरकार फक्त इमारत, यंत्र सामग्री, साहित्य इत्यादींचा खर्च उचलणार आहे. हे तर सर्वज्ञात आहे की अशा योजनांचा महसुली खर्चच जास्त असतो. भांडवली खर्च हा त्याचा एक छोटा भाग असतो. आयसीडीएसचेच उदाहरण घ्या, केंद्र सरकार आता फक्त अंगणवाडी केंद्र बांधण्याचे काम करेल व राज्य सरकारला अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन, पूरक पोषण आहार, भाडे, प्रवास खर्च इत्यादी महसुली खर्चाचा भार उचलावा लागेल जो आयसीडीएसच्या एकूण खर्चाचा फार मोठा भाग आहे. एकदा अंगणवाडी केंद्र बांधून झाले की केंद्र सरकारची जबाबदारी जवळ जवळ संपणार आहे पण राज्य सरकारांना मात्र त्यानंतर योजना चालवण्याचा संपूर्ण खर्च उचलावा लागणार आहे.       
अनेक अर्थतज्ञांनी हे दर्शवले आहे की राज्य सरकारांना निधी वाढवून दिल्याचा केंद्र सरकारचा दावा पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे. त्यांनी हे दाखवून दिले आहे की जरी राज्यांकडे कर सुपुर्त करायच्या प्रमाणात वाढ झालेली असली तरी राज्यांकडे वर्ग करावयाच्या एकूण संसाधनांमध्ये ज्यात योजनांतर्गत अनुदान व योजनेतर अनुदान दोन्हींचा समावेश असतो, त्यात २०१०-११ ते २०१५-१६ या कालावधीत प्रत्यक्षात अल्पशी घटच झाली आहे. अनेक राज्यांनी केंद्र सरकारचा हा दावा खोडून काढला आहे आणि तक्रार केली आहे की सकल घरेलू उत्पादनातील राज्य सरकारांच्या वाट्याची टक्केवारी प्रत्यक्षात कमी झाली आहे. पण त्याच वेळी त्यांच्यावर केंद्रीय योजनांचे वाढते ओझे मात्र लादले जात आहे. यातून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. राज्य सरकारांकडच्या संसाधनांची कमतरता लक्षात घेता किती राज्य सरकारे आहे त्या स्वरूपात ह्या योजना चालू ठेवू शकतील? लाखो अंगणवाडी कर्मचारी, आशा आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे काय भविष्य असणार आहे? गरीब कुटुंबामधील बालके आणि महिला यांना ह्या सर्व योजनांमधून दिली जाणारी सेवा चालू राहणार आहे की नाही? भाजप सरकारकडे ह्या प्रश्नांचे काय उत्तर आहे? अजून तरी त्यांनी यावर मौनच बाळगलेले आहे.
सरकार हे मान्य करते की ह्या योजनांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवा आपल्या अमूल्य मनुष्यबळाच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहेत. हे देखील मान्य करते की योजना कर्मचारी देशाच्या मानवी विकासासाठीच्या प्रयत्नांचा कणा आहेत. हे देखील मान्य करते की त्यांना मिळणारी वागणूक योग्य नाही आणि त्यांच्या मागण्याही रास्तच आहेत. पण काँग्रेस असो वा भाजप, आत्तापर्यंत केंद्रामध्ये सत्तेत आलेल्या सर्व सरकारांनी त्यांच्या मागण्यांना तोंडदेखली सहानुभूती दाखवत प्रत्यक्षात मात्र आर्थिक संसाधनांच्या कमतरतेचे निमित्त पुढे करून त्यांच्या या रास्त मागण्या फेटाळल्या आहेत.    
पण खरी परिस्थिती काय आहे? खरोखरच सरकारकडे पैसे नाहीत काय? सरकार त्यांच्यापुढे वेगवेगळ्या प्रकारची सूट मागणाऱ्या देशी विदेशी कॉर्पोरेटस् आणि बड्या व्यापारी घराण्यांना, उद्योगांच्या म्होरक्यांना, गुंतवणूकदारांना हेच उत्तर देते काय? नाही नाही, अजिबात नाही. अशा गोष्टीची आपण नवउदार जागतिकीकरणाच्या काळात स्वप्नातही कल्पना करू शकणार नाही. ज्या सरकारकडे कर्मचाऱ्यांसाठी पैसै नाहीत, त्यांच्याकडे देशी, विदेशी बड्या कॉर्पोरेटसवर उधळण्यासाठी मात्र निधीची अजिबात कमतरता नाही. प्रत्यक्षच पहा ना, गेल्या कित्येक वर्षांपासून, वर्षांमागून वर्षे, दर वर्षी न चुकता सरकार ह्या कॉर्पोरेटसना सरासरी ५ लाख कोटींच्या कर सवलती देत असते. या कर सवलतींव्यतिरिक्त दर वर्षी जवळ जवळ ४ ते ५ लाख कोटींचा कर गोळा न करता तसाच सोडून दिला जातो. याचा अर्थ आहे, दर वर्षी या कॉर्पोरेटसना ८ ते १० लाख कोटींची खिरापत वाटली जाते. लक्षात ठेवा, हा जनतेचा पैसा आहे, सत्ताधारी लोकांची खाजगी संपत्ती नाही. कामगार, कर्मचाऱ्यांच्या अधिकारांचे हनन करण्यासाठीच त्यांना समाज सेवक आणि कार्यकर्ते म्हटले जाते. गरिबांना अनुदान देणे चुकीचेआहे म्हणून ते मागे घेतले जाते पण देशाची आणि देशातील नैसर्गिक साधन संपत्तीची लूट करणाऱ्या बड्या देशी विदेशी कॉर्पोरेटस आणि बड्या व्यापारी घराण्यांकडे जनतेच्या वाटणीचे लाखो करोडो रुपये सोपवले जातात ते मात्र प्रोत्साहन असते!   ह्यालाच म्हणतात नवउदार जागतिकीकरण.
हे सरकार कुणासाठी काम करत आहे? ते कुणाच्या हितांचे रक्षण करत आहे? देशाची संपत्ती निर्माण करणाऱ्या कामगारांच्या, देशाच्या भावी मनुष्यबळाचे म्हणजेच बालकांचे संगोपन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हितांचे? की देशाची आणि देशाच्या नैसर्गिक साधन संपत्तीची लूट करणाऱ्या, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवणाऱ्या, कर बुडवून देशाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या, जास्तीत जास्त नफा कमवायच्या आपल्या लोभापायी कामगारांचे रक्त मांस शोषून घेणाऱ्या कॉर्पोरेटसच्या हितांचे? हे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत आणि ते नीट समजून घेतले पाहिजेत. परिस्थिती सुधारण्याच्या आपल्या लढ्याला योग्य दिशा देणे अत्यंत आवश्यक आहे.
योजना कर्मचारी आणि संपूर्ण कामगार वर्ग ह्या विश्वासघाताचे मूक साक्षीदार बनून राहू शकत नाहीत. योजना कर्मचारी, विशेषत: अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, आशा, शिक्षण सेवक इत्यांदींना लढ्याचा एक उज्जवल इतिहास आहे ज्यात त्यांनी संपूर्ण देशभरात केवळ अन्यायालाच नाही तर पोलिसांच्या दडपशाहीला देखील तोंड दिलेले आहे. महिला योजना कर्मचाऱ्यांनी तर आपल्या घरातील कौटुंबिक दडपणांवर मात करत, कुटुंबियांना आणि मुलांना समजावून सांगत, कधी कधी त्यांना देखील आपल्या लढ्यात सहभागी करून घेत आपला लढा सुरु ठेवलेला आहे. इतके लढे आणि त्याग करून देखील आमच्या मागण्या मान्य का होत नाहीत? मागण्या रास्त असल्याचे सरकारने मान्य करून देखील त्या फेटाळल्या का जातात? हे सर्व प्रश्न लढणाऱ्या योजना कर्मचाऱ्यांच्या मनात सारखे घोळत असतात. ह्या प्रश्नांची उत्तरे सरकारने राबवलेल्या घोरणांमध्येच सापडतील.
हे लढे तेव्हाच यशस्वी होतील जेव्हा कामगार आणि योजना कर्मचारी त्यांच्या मूलभूत प्रश्नांमागची खरी कारणे, लागोपाठ सत्तेत आलेल्या सरकारांची त्या समस्या निर्माण करणारी धोरणे आणि त्या धोरणांना पुढे रेटणारे त्यांचे राजकारण नीट समजून घेतील. आपल्या लढ्यांचे टोक लोकांपेक्षा नफ्याला जास्त महत्व देणाऱ्या नवउदार धोरणांच्या दिशेने वळवले गेले पाहिजे. आपले लढे कामगारांच्या बाजूच्या धोरणासाठी, लोकांच्या बाजूच्या धोरणांसाठी, नफ्यापेक्षा लोकांना जास्त महत्व देणाऱ्या धोरणांसाठी होणे अत्यंत आवश्यक आहे.
ही वेळ आहे असे लढे अजून तीव्र करण्याची. लोकांना मूलभूत कल्याणकारी सेवा देण्याची आपली जबाबदारी झटकण्याची परवानगी आपण सरकारला देऊ शकत नाही. आपल्या इतक्या वर्षांच्या अविरत कष्टांच्या आधारावर लोकांच्या पोषण, आरोग्य आणि साक्षरतेच्या स्तरामध्ये त्यांनी जी सुधारणा करवून घेतलेली आहे, त्यावरून आपण त्यांना खाली घसरू देऊ शकत नाही. गरीब महिला आणि बालकांना सेवा देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य झोकून देणाऱ्या योजना कर्मचाऱ्यांची रोजीरोटी हिरावून घेऊन त्यांना म्हातारपणी रस्त्यावर भीक मागायला लावण्याची परवानगी आपण देऊ शकत नाही. कोणत्याही परिस्थितीत नाही.
ही लढण्याची वेळ आहे. आपला लढा बळकट करण्याची, जास्त खोलवर नेण्याची गरज आहे. सर्व योजना कर्मचाऱ्यांनी सर्व केंद्र पुरस्कृत योजनांवरील भारत सरकारने करावयाची आर्थिक तरतूद मूळ स्थितीत नेण्यासाठीच नाही तर वाढवण्यासाठी आपल्याला पूर्ण ताकदीनिशी एकत्र आले पाहिजे. आपल्या किमान वेतन, सामाजिक सुरक्षा लाभ आणि नियमितीकरण या मूलभूत मागण्यांसाठी त्यांनी भक्कम एकजूट केली पाहिजे. त्यांनी आपल्या लढ्यात सहभागी होण्यासाठी लोकांना एकत्र केले पाहिजे, या योजनांचा बचाव करून त्या अशाच चालू राहण्यासाठीच्या लढ्यात लाभार्थ्यांना देखील सहभागी करून घेतले पाहिजे.
काँग्रेस असो की भाजप, वा एखादा प्रादेशिक पक्ष, त्यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या सरकारांच्या नवउदार धोरणांविरोधातील लढा अजून तीव्र करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी कामगार वर्गाच्या सर्व विभागांची एकजूट होणे अत्यंत आवश्यक आहे.                 

२ सप्टेंबर २०१५ला होणारा देशव्यापी सार्वत्रिक संप या महत्वपूर्ण लढ्याचाच एक भाग आहे. कामगार विरोधी, जन विरोधी नवउदार धोरणे परतवून लावण्यासाठीच्या दीर्घ लढ्याचाच हा भाग आहे. देशातील तमाम कामगार वर्ग केंद्रीय कामगार संघटनांच्या नेतृत्वाखाली या सार्वत्रिक संपासाठी सज्ज होतो आहे. योजना कर्मचारी देखील या संपात सहभागी होऊन या सरकारला हा इशारा देणार आहेत की लोकांवरचा असा कोणताही हल्ला खपवून घेतला जाणार नाही.     
असंघटित क्षेत्र कामगारांसाठी सामाजिक कल्याण- भ्रम आणि वास्तव
-हेमलता
अनुवाद- शुभा शमीम
एक वर्षापूर्वी सत्तेत आल्यापासून भाजप सरकार आत्तापर्यंत कोणतेही केंद्र सरकार जे करू शकले नाही ते काम करण्यासाठी उतावळे झाले आहे- ते म्हणजे आपल्या देशातील कामगारांना मिळालेले जे काही कायदेशीर संरक्षण आहे त्याला पूर्णपणे संपुष्टात आणणे. असे प्रयत्न काही नवीन नाहीत. कामगार कायद्यांमध्ये दुरुस्त्या करण्याच्या व महत्प्रयासाने मिळवलेले अधिकार आणि संरक्षण काढून घेण्याच्या प्रयत्नांना कित्येक दशकांचा एक मोठा इतिहास आहे ज्यांची गती नवउदार अंमलामध्ये झपाट्याने वाढली. पण कामगार वर्गाच्या दृढ प्रतिकारामुळे असे प्रयत्न आजतागायत यशस्वी होऊ शकलेले नाहीत. केंद्रातील सध्याचे भाजप सरकार, ज्यांचा विजयच मुळी देशी विदेशी कॉर्पोरेट्सनी दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळे झालेला आहे, हे उद्दीष्ट पार पाडण्यासाठी जास्तच आक्रमक पवित्रा घेत आहे. कामगार वर्गाने या हल्ल्याचा अधिक निर्धाराने व आक्रमकपणे मुकाबला करून मोदी सरकारचे हे भयंकर कारस्थान हाणून पाडले पाहिजे.        
सरकार या बाबतीत दुटप्पी दृष्टीकोण घेत आहे. एका बाजूला सरकार कामगार कायद्यांमध्ये दुरुस्त्या करण्यासाठी वेगाने पुढे जात आहे. एका मागून एक कायद्यांमध्ये दुरुस्त्या केल्या जात आहेत. याचे उद्दीष्ट आहे संघटित क्षेत्रातील कामगारांना, संघटित होण्याच्या व सामुहिक वाटाघाटी करण्याच्या जे किमान कागदावर तरी उपलब्ध असलेल्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण हिरावून घेणे. याचे उद्दीष्ट आहे सध्या कामगार कायद्याचे सर्रास होणारे उल्लंघन कायदेशीर करणे, मालकांना कामगारांना कधीही कामावर घेण्याचे व काढून टाकण्याचे आणि कामगारांचे शोषण करण्याचे अनिर्बंध स्वातंत्र्य देणे, मालकांना कामगार संघटनांपासून मुक्त असे कामाचे ठिकाण भेट म्हणून देणे.  
दुसऱ्या बाजूला सरकार मोठ्या धामधुमीत माध्यमांसमोर देशातील एकूण कामगार वर्गाच्या ९३ टक्के असलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अनेक योजनांची घोषणा करीत आहे. इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना जर लाभ मिळणार असेल, तर कामगारांच्या एका छोट्या संघटित विभागाला मेक इन इंडिया मध्ये गुंतवणूक आकर्षित करून घेण्यासाठी केल्या गेलेल्या, आपल्या लक्षावधी बेरोजगार युवकांना काम मिळवून देणाऱ्या आणि भारताला व्यवसाय करण्याच्या सहजतेच्या निर्देशांकात वरचा क्रमांक मिळवून देणाऱ्या कामगार कायद्यांमधील सुधारणां मुळे थोड्याफार अडचणी सोसाव्या लागल्या तर काय हरकत आहे असा हा युक्तीवाद आहे.   
योजना- दावे आणि वास्तव
पण वास्तव काय आहे? सिटूने या तथाकथित कामगार कायद्यातील दुरुस्त्यांचा आणि त्यांचा कामगारांवर होणाऱ्या परिणामांचा अन्य एका पुस्तिकेत खरमरीत समाचार घेतला आहे. इथे आपण असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सरकारने जाहीर केलेल्या योजनांचा त्यांना खरोखर लाभ होणार आहे काय याचा परामर्श घेणार आहोत.   
असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा लाभ आणि असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा राष्ट्रीय कोषाचे गठन या मागण्या संयुक्त कामगार चळवळीच्या दहा कलमी मागणी पत्रकाचा एक महत्वाचा भाग राहिल्या आहेत. २००८ साली पारित केलेल्या असंघटित क्षेत्र कामगार सामाजिक सुरक्षा कायद्याला आता ६ वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. राष्ट्रीय पातळीवर असंघटित क्षेत्र कामगार सामाजिक सुरक्षा बोर्डाचे गठन करण्यात आले आहे. बोर्डाने असंघटित क्षेत्र कामगारांना वृद्धत्व, आरोग्य, मातृत्व, अपंगत्व इत्यादींमध्ये सुरक्षा देणारे मूलभूत कल्याणकारी उपक्रम सार्वत्रिकपणे लागू करण्याच्या अनेक शिफारसी एकमताने केल्या आहेत. परंतु आजतागायत या कायद्याअंतर्गत एकही नवीन योजना तयार करण्यात आलेली नाही. आधीच अस्तित्वात असलेल्या दहा कल्याणकारी योजना असंघटित क्षेत्रातील कामगारांना लागू करण्याचाच प्रस्ताव आहे. यातील बहुतेक सर्व योजना दारिद्र्य रेषेखालील लोकांनाच लागू आहेत, ही रेषा हास्यास्पदरित्या इतकी खाली ठेवलेली आहे की असंघटित क्षेत्रातील ९० टक्के कामगार या योजनांच्या कक्षेतून बाहेरच ढकलले जातात.            
असंघटित क्षेत्र कामगार सामाजिक सुरक्षा कायदा हे नमूद करतो की प्रत्येक असंघटित क्षेत्रातील कामगाराला जिल्हा प्रशासनाद्वारे त्याचा विशिष्ठ ओळख क्रमांक असलेले एक स्मार्ट कार्ड दिले जाईल. हा कायदा अस्तित्वात येऊन सहा वर्षे झाली तरी अजूनही या कायद्याअंतर्गत एकही स्मार्ट कार्ड दिले गेलेले नाही. भूतपूर्व युपिएच्या काळात नाही आणि मोदी सरकारच्या या गेल्या एक वर्षात देखील नाही. सरकार अजूनही हे कार्ड देण्यासाठीची प्रशासकीय यंत्रणा निर्माण करण्याच्याच प्रक्रियेत आहे. कामगार संघटनांनी या कायद्याखाली सामाजिक सुरक्षा देण्यासाठी राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा कोष गठित करण्याची सातत्याने मागणी केलेली आहे. राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा बोर्डाने देखील तशी एकमताने शिफारस केली आहे. युपिए सरकारने २०१०-११च्या बजेटमध्ये फक्त १००० कोटींची तरतूद करून धूळफेकच केली. पण आजतागायत यातील एकही पैसा असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सामाजिक कल्याणासाठीच्या कोणत्याच योजनेवर खर्च करण्यात आलेला नाही.      
राष्ट्रीय स्वास्थ बीमा योजनेचे वास्तव
१ एप्रिल २००८ला कार्यरत झालेल्या राष्ट्रीय स्वास्थ बीमा योजनेच्या (आरएसबीवाय) अंतर्गत ३.८५ कोटी स्मार्ट कार्डांचे वाटप केल्याचा दावा सरकारने केला आहे. मूलत: आरएसबीवाय दारिद्र्य रेषेखालील लोकांना लागू करण्यात आलेली होती परंतु नंतर तिचा असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या, बांधकाम कामगार, रेल्वेचे लायसन्सधारी हमाल, फेरीवाले, मागील आर्थिक वर्षात किमान १५ दिवस काम केलेले मनरेगा कामगार, बिडी कामगार, घरेलू कामगार, सफाई कामगार, खाण कामगार, रिक्षा ओढणारे, कचरा वेचक, रिक्षा/टॅक्सी चालक इत्यादींसहित काही विभागांपर्यंत विस्तार करण्यात आला. लाभ घेणारे सर्व असंघटित क्षेत्रातील कामगार होते असे जरी गृहित धरले तरी असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या एकूण ४३ कोटी संख्येच्या तुलनेत आरएसबीवायचा लाभ अगदीच छोट्याशा म्हणजेच ९ टक्के विभागापर्यंत पोहोचवता आला आहे.  
शिवाय आरएसबीवाय असंघटित क्षेत्रातील कामगारांमधील सर्व विभागांना लागू नाही. इतर सर्व असंघटित क्षेत्रातील कामगार दारिद्र्य रेषेचा निकष लावल्यामुळे आरएसबीवायच्या कक्षेबाहेर ढकलले जात आहेत. असंघटित क्षेत्रातील कामगारांमधील वर उल्लेख केलेल्या काही मोजक्या विभागांनाच दारिद्र्य रेषेखाली  अथवा वर हा विचार न करता आरएसबीवाय लागू करण्यात आली आहे. या विभागांमधीलही फार थोड्या भागाला आरएसबीवायचा प्रत्यक्ष लाभ मिळाला आहे. आरएसबीवाय सरकारच्या अनेकविध योजनांमध्ये काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी, आशा, मध्यान्ह भोजन कामगार, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प इत्यादी योजना कर्मचाऱ्यांना लागू करावी अशी राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा बोर्डाने एकमताने शिफारस करूनही त्या दिशेने कोणतीच पावले उचलली गेलेली नाहीत.       
श्रम मंत्रालयाने इतकी ताकद आणि प्रयत्नांची गुंतवणूक केल्याचा दावा करूनही ७ वर्षांमध्ये ९ टक्क्यांहूनही कमी असंघटित क्षेत्रातील कामगारांपर्यंत आरएसबीवायसारख्या योजनेचा लाभ पोहोचविण्याची करामत करण्यात जर सरकार यशस्वी होत असेल तर सरकारची कितीही इच्छा असली तरी ४३ कोटी असंघटित कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी किती वर्षे लागतील?
आरएसबीवायमध्ये जरी खूप उणिवा असल्या तरी आरएसबीवायने गरिबांना किमान काही दिलासा दिला आहे. आरएसबीवायची वर्गणी संपूर्णपणे केंद्र व राज्य सरकारांनी मिळून भरली होती. लाभार्थ्यांना नोंदणी आणि नूतनीकरणाच्या वेळी फक्त ३० रुपयांची नाममात्र वर्गणी वगळता कोणतीही रक्कम द्यायची आवश्यकता नाही. सध्याच्या सरकारने काही बदल करण्याच्या नावाखाली आरएसबीवायची नोंदणी पूर्णपणे थांबवली आहे. आरएसबीवायमधील उणीवा दूर करण्यासाठी श्रम व रोजगार मंत्रालयाची विविध स्तरावरील क्षमता वाढवणे, तळातील तांत्रिक प्रश्न सोडवण्यासाठी तांत्रिक मदत केंद् उभारणे आदी अनेक पावले उचलली जात असल्याचे श्रम व रोजगार मंत्रालयाने मांडले आहे. परंतु सरकारच्या निर्णयानुसार आरएसबीवायच्या अंमलबजावणीचे कार्य १ एप्रिल २०१५ पासून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे वर्ग करण्यात आले आहे.   
असे देखील घोषित करण्यात आले होते की भारत सरकारने आरएसबीवाय, आम आदमी बीमा योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धत्व पेन्शन योजना या तिन्ही महत्वाच्या योजना एकाच स्मार्ट कार्डच्या माध्यमातून लागू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. स्मार्ट कार्ड जन धन योजनेच्या खाते क्रमांकाला व आधार कार्ड क्रमांकालाही जोडले जाणार आहे. आम आदमी बीमा योजनेसारख्याच लाभ देणाऱ्या अन्य योजना जाहीर झाल्यानंतर आम आदमी बीमा योजनेचे भविष्यच मुळात अनिश्चित आहे.  
नवीन योजना – खरोखरच नवीन आहेत काय?
९ मे २०१५ रोजी भाजप सरकारने देशातील विविध ११५ ठिकाणाहून खूप धामधुमीत तीन सामाजिक सुरक्षा योजनांची घोषणा केली. त्यामधील प्रधान मंत्री जीवन ज्योती बीमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना या दोन विमा योजना असून तिसरी अटल पेन्शन योजना ही प्रामुख्याने असंघटित क्षेत्रातील कामगारांवर केंद्रित अशी पेन्शन योजना आहे. प्रधानमंत्री आणि माजी प्रधानमंत्र्यांचे नाव त्यांना जोडले गेले असले तरी या पूर्णपणे अंशदायी योजना असून सरकार त्यांच्यासाठी कोणताही आर्थिक आधार उपलब्ध करून देणार नाही.
या सर्व योजना बचत खात्यांशी जोडलेल्या आहेत. ११ फेब्रुवारी २०१५च्या बिझनेस स्टँडर्डमधील अहवालानुसार जन धन योजना जाहीर झाल्यानंतर ५ फेब्रुवारी २०१५ रोजी देशातील एकूण बँक खात्यांची संख्या १२७६.५० लाख इतकी झाली होती. परंतु जन धन योजनेचे सर्व खातेदार या योजनांचा लाभ घेऊ शकणार नाहीत कारण जन धन योजनेच्या खात्यात कोणतीही शिल्लक राखणे बंधनकारक नसले तरी या योजनांचा लाभ घेण्यासाठी मात्र ग्रामीण भागात ५०० व शहरांमध्ये १००० रुपयांची किमान शिल्लक राखणे बंधनकारक आहे. अहवालानुसार जन धन योजनेतील ६६ टक्के म्हणजे ८४३.४० लाख खात्यांमध्ये शून्य शिल्लक होती. याचा अर्थ आहे की त्यांना या योजनांमधून वगळले जाईल. कामाची निश्चिती नसलेले, महिन्याला जेमतेम २ ते ३ हजार रुपये कमवणारे असंघटित कामगार आपल्या खात्यात १००० रुपये शिल्लक ठेवतील ही अपेक्षा करणे कितपत योग्य आहे?     
प्रधान मंत्री जीवन ज्योती बीमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना या दोन्ही योजना सध्या अस्तित्वात असलेल्या २००७ साली सुरु झालेल्या आम आदमी बीमा योजनेत बदल करून बनविल्या आहेत. आम आदमी बीमा योजना ४७ निर्धारित व्यवसाय/उद्योगांमधील १८ ते ५९ वयोगटातील दारिद्र्य रेषेखालील किंवा थोडेसे वर असलेल्या व्यक्तींना जीवन आणि अपंगत्वाबाबत सुरक्षा देते. त्याची एकूण वर्गणी २०० होती ज्यातील १०० केंद्र सरकार व उरलेले १०० लाभार्थी किंवा राज्य सरकार भरत होते.     
प्रधान मंत्री जीवन ज्योती बीमा योजना १८ ते ५० वयोगटाच्या व्यक्तींना लागू आहे, ज्याची वर्गणी ३३० रुपये आहे. ही सर्व रक्कम संबंधित व्यक्तीने भरावयाची आहे. त्याच बरोबर जीवन विम्याची रक्कम वाढविण्यात आली आहे. आम आदमी बीमा योजनेत नैसर्गिक मृत्यूला ३०००० आणि अपघाती मृत्यूला ७५००० ची सुरक्षा देण्यात येते. प्रधान मंत्री जीवन ज्योती बीमा योजना कोणत्याही कारणाने मृत्यू आल्यास २ लाख रुपयांचे संरक्षण देते. पण ५५व्या वर्षी तिचा लाभ मिळणे बंद होते आणि ५० वयानंतर कुणीही योजनेत नव्याने प्रवेश घेऊ शकत नाही. त्याशिवाय आम आदमी बीमा योजनेमध्ये अंशत: कायम अपंगत्वात ३७५०० व पूर्ण कायम अपंगत्वात ७५०००चे संरक्षण मिळते. त्याशिवाय यात ९वी ते १२वीच्या जास्तीत जास्त २ पाल्यांना महिना १०० चे शिक्षण सहाय्य देखील मिळते. अपंगत्व आणि शिक्षण सहाय्य हे दोन्ही लाभ प्रधान मंत्री जीवन ज्योती बीमा योजनेत मिळत नाहीत.      
प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना १८ ते ७० वयोगटातील व्यक्तींना वार्षिक १२ रुपये वर्गणीत मृत्यू व कायम अपंगत्वात सुरक्षा देते. अपघाती मृत्यू/ पूर्ण कायम अपंगत्वात २ लाखाचे संरक्षण आहे. अंशत: कायम अपंगत्वात १ लाखाचे संरक्षण आहे. अपघाताचे संरक्षण वयाच्या ७० वर्षांनंतर बंद होते. दोन्ही योजनांचे बँक खाते बंद केल्यास किंवा पुरेशी शिल्लक न ठेवल्यास बंद होते. 
मिळालेल्या माहितीनुसार प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेत ५ कोटी तर प्रधान मंत्री जीवन ज्योती बीमा योजनेत २ कोटी लोक सहभागी झाले आहेत. ३१ मे २०१५ पर्यंत ही संख्या जरी वाढली तरी एकूण असंघटित कामगारांमधले कोणतेही संरक्षण नसलेले ८० टक्के कामगार शिल्लक राहतीलच.
शिवाय विमा कंपन्या या योजनेच्या अपुऱ्या वर्गणीमुळे नाखूष आहेत ते वेगळेच. हीच वर्गणी कायम राहील याची हमी देता येत नाही कारण विम्या कंपन्या त्यांना वर्षभरात आलेल्या अनुभवानुसार हप्ता वाढवून मागू शकतात.
अटल पेन्शन योजना देखील २०१० मध्ये सुरु झालेल्या व सध्या असलेल्या स्वाभिमान योजनेची बदललेली आवृत्ती आहे. फरक इतकाच आहे की स्वावलंबनमध्ये पेन्शनची रक्कम निश्चित नव्हती. तर अटल पेन्शन योजनेत व्यक्तीच्या योगदानानुसार त्याची/तिची वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर १००० ते ५००० पर्यंत रकमेची हमी आहे. जमा झालेली रक्कम काढून घेता येणार नाही. या योजनेचा लाभ १८ ते ४० वयोगटाच्या अन्य कोणतीही वैधानिक सामाजिक सुरक्षा लागू नसलेल्या व आयकर न भरणाऱ्या व्यक्ती घेऊ शकतात.    
अटल पेन्शन योजनेत सरकार व्यक्तीच्या योगदानाच्या ५० टक्के किंवा १००० रुपये यातील कमी असलेली रक्कम २०१५-१६ या वर्षापासून पुढे ५ वर्षे भरेल. परंतु हे योगदान फक्त १ जून ते ३१ डिसेंबर २०१५ दरम्यान सामील झालेल्या लोकांसाठीच असेल.
१८ वर्षे वयावर कामाला लागणाऱ्या व्यक्तीला वयाच्या ६० वर्षापर्यंत दर महिना २१० रु. भरल्यास ६० वर्षे वयानंतर दर महिना ५००० रु पेन्शन मिळेल. ४० वयावर सामील होणाऱ्या व्यक्तीला मात्र तेवढीच रक्कम मिळविण्यासाठी दर महिना १४५४ रु भरावे लागतील. याचा हिशोब केल्यास लक्षात येईल की ७ टक्के चलनवाढीचा दर लक्षात घेता ही रक्कम १२९२ रु इतक्या मूल्याची असेल. म्हणजे ४० वर्षे वयाच्या व्यक्तीला त्याच्या मासिक योगदानापेक्षा कमी रकमेचा परतावा मिळेल.  
कामगाराच्या योगदानावर मिळणारे प्रत्यक्ष व्याजही फार कमी आहे. हीच रक्कम त्यानी आवर्ती ठेवेत ठेवली तर तिला जास्त व्याज मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार अटल पेन्शन योजनेला खूपच कमी प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत फक्त ५०००० कामगार यात सामील झाले आहेत. सर्व स्वावलंबनच्या लाभार्थ्यांना इथे वर्ग करण्यात येणार आहे. स्वावलंबन योजनेलाही फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. २०१४ पर्यंत तिचे एकूण वर्गणीदार फक्त ३० लाख होते. ही संख्या एकूण कामगारांच्या संख्येच्या मानाने अगदीच अल्प आहे.
या नवीन योजनेचे उद्दीष्ट दुसरे तिसरे काही नसून लोकांना बँक खाते उघडण्यासाठी व त्यांचे पैसे बँकेत जमा करण्यासाठी प्रलोभन देणे आणि शून्य शिलकीच्या खात्यांना देखील लोकांच्या आर्थिक सहभागाचे प्रतिक असल्याचा भ्रम निर्माण करणे हेच आहे. पण खरोखरच याचा फायदा कुणाला मिळणार आहे का?
सध्या असलेले लाभही हिरावून घेतले जाणार
असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी नक्राश्रू ढाळत आणि त्यांचे हितैषी असल्याचा भ्रम निर्माण करत भाजप सरकार प्रत्यक्षात मात्र विश्वासघातकीपणाने आत्तापर्यंत त्यांना लागू असलेले अनेक लाभ हिरावूनच घेत आहे. असंघटित कामगारांना, विशेषत: त्यांच्या कुटुंबांमधील महिला व बालकांना लाभ देणाऱ्या सामाजिक कल्याणाच्या योजनेवरील अनुदानात भयंकर कपात करण्यात येत आहे. १४ व्या वित्त आयोगाच्या वाढीव वित्तीय हस्तांतरणाच्या शिफारसीचे निमित्त पुढे करून राज्य सरकारांवर आर्थिक ओझे टाकण्यात येत आहे.   
महिला व बाल विकास मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि शिक्षणावरील निधीत प्रचंड कपात करण्यात आली आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आयसीडीएस) ही केंद्र पुरस्कृत योजना, जी गेली जवळ जवळ ४० वर्षे चालू आहे, तिच्यासाठीच्या निधीत अर्ध्याहून जास्त कपात करण्यात आली आहे. २०१४-१५च्या केंद्रीय बजेटमधील आयसीडीएसचा वाटा १८३९१ कोटी होता तो २०१५-१६च्या बजेटमध्ये ८७५४ कोटी इतका प्रचंड खाली आणण्यात आला. आयसीडीएसला राज्य सरकारांकडे वर्ग करण्यात येत आहे. भारत सरकार आयसीडीएसचा, अंगणवाड्यांचे बांधकाम इत्यादींसारखा फक्त भांडवली खर्च उचलेल व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन, पूरक पोषण आहार इत्यादींसारखा महसुली खर्च राज्य सरकारांना उचलावा लागणार आहे, जो आयसीडीएसच्या एकूण खर्चाचा एक मोठा भाग आहे.      
त्याचप्रमाणे राष्ट्रीय आरोग्य मिशनचीही (एनएचएम) केंद्र आणि राज्यांमधील खर्चाच्या वाटपाची पद्धत बदलली आहे. एनएचएमचा निधी ३९०० कोटींनी कमी केला आहे. भारत सरकार फक्त भांडवली खर्च करेल तर राज्य सरकारांना महसुली खर्च करावयाचा आहे, म्हणजेच कर्मचाऱ्यांचे पगार इत्यादी. आजही समाज आरोग्य केंद्र तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील तंत्रज्ञ, डॉक्टर्स आणि विशेषज्ञ इत्यादी आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. कित्येक जणांना कंत्राटी पद्धतीने लावण्यात आले आहे. त्यांते वेतन नियमितपणे दिले जात नाही.   
भारत सरकार सर्व शिक्षा अभियान व मध्यान्न भोजन कार्यक्रमाचा खर्च यापुढेही उचलणार असले तरी त्यांच्या निधीत मोठी कपात झाली आहे. २०१५-१६च्या बजेटमध्ये सर्व शिक्षा अभियानाचा निधी २७७५८ कोटींवरून २२००० कोटींवर तर मध्यान्न भोजन कार्यक्रमाचा निधी १३२२५ कोटींवरून ९२३६ कोटींवर खाली आणण्यात आला आहे.  
असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सध्या उपलब्ध असलेले मोजके कल्याणकारी लाभ हिरावून घेऊन सरकार ज्यासाठी एक पैसाही खर्च करणार नाही अशा योजना जाहीर करून त्यांच्यासाठी काम करत असल्याचा दावा करत आहे हे खरोखर धाडसच म्हणावे लागेल.   
योजना कर्मचाऱ्यांचा विश्वासघात
भारत सरकार स्वत:च्या योजनांमध्ये अहोरात्र काम करणाऱ्या लाखो योजना कर्मचाऱ्यांनाही अत्यंत अपमानास्पदरित्या वागवत आहे. आयसीडीएसमध्ये काम करत असलेल्या अंगणवाडी सोविका व मदतनीस, राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या आशा, मध्यान्न भोजन कार्यक्रमात काम करणारे शालेय पोषण आहार कर्मचारी, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पांमध्ये काम करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि केंद्राच्या मदतीने चालणाऱ्या राज्य विस्तार कार्यक्रमाअंतर्गत विस्तार सुधारांसाठी राबविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार अभियान, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था (आत्मा) इत्यादींमध्ये काम करणाऱ्या योजना कर्मचाऱ्यांकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.      
४५व्या भारतीय श्रम परिषदेने समाज सेविका,स्वयंसेविका,कार्यकर्ते,मित्र,पाहुणे अशा विविध नावांनी काम करणाऱ्या योजना कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्याचा दर्जा आणि किमान वेतन व सामाजिक सुरक्षा देण्याची शिफारस जवळ जवळ एकमताने केली आहे. तरीसुद्धा सरकारने या शिफारसी अंमलात आणण्यासाठी कोणतीही पावले उचलेली नाहीत. त्यांच्या अल्प मानधनात वाढसुद्धा केली गेली नाही. उलट त्याऐवजी निधीत प्रचंड कपात केल्यामुळे त्यांचे भविष्यच पूर्णपणे अनिश्चित केले गेले आहे. राज्य सरकारांकडे केल्या जाणाऱ्या आर्थिक हस्तांतरणात वाढ केली असल्याचा दावा जरी भारत सरकार करत असले तरी अनेक राज्यांनी या दाव्यापुढेच प्रश्नचिन्ह उभे केले आहे आणि असा प्रतिवाद केला आहे की उलट अनेक केंद्रीय योजनांचा बोजा त्यांच्यावर टाकला जात असताना प्रत्यक्षात मात्र त्यांच्या वाट्याला येणाऱ्या सकल घरेलू उत्पादनातील (जिडीपी) टक्केवारीत घट झाली आहे. अशा परिस्थितीत किती राज्य सरकारे या सर्व योजनांना आहे त्या स्वरूपात चालवू शकणार आहेत? गरीब महिला व बालकांना आणि देशाला नाममात्र मानधनात आयुष्यभर महत्वपूर्ण सेवा देणाऱ्या लाखो अंगणवाडी कर्मचारी, आशा आणि शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे भविष्य काय असणार आहे? भाजप सरकारकडे या प्रश्नांचे काही उत्तर आहे काय? अजूनपर्यत तरी सरकार याबाबतीत संपूर्णपणे मौन बाळगून आहे.        
हे सर्व योजना कर्मचारी बालकांचा विकास म्हणजेच देशाच्या भावी मनुष्यबळाच्या निर्माणात महत्वपूर्ण योगदान देत आहेत. अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, आशा, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अथक प्रयत्नांमुळेच कुपोषण, बाल व मातामृत्यू दर, शाळागळतीचा दर, बालकामगारांना नियमित शाळेत दाखल करून त्यांना मुख्य धारेत आणणे इत्यादी समस्यांची तीव्रता कमी करण्यात यश मिळालेले आहे. असंघटित क्षेत्रातील कामगार, गरीब शेतकरी व शेतमजूरांना ह्या सर्व योजनांचा लाभ मिळत आहे. ह्या सर्व योजनांवरील खर्चामध्ये प्रचंड कपात करून सरकारने फक्त यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रोजीरोटीवरच संक्रांत आणलेली नाही तर ग्रामीण व शहरी भागातील असंघटित कामगारांसहित देशातील तमाम गरीबांना जे काही थोडेफार कल्याणकारी लाभ मिळत होते ते नाकारून देशाचे भविष्यच अंध:कारात लोटलेले आहे.
काँग्रेस असो वा भाजप, कुणाच्याही नेतृत्वाखाली केंद्रात लागोपाठ आलेल्या सरकारांनी लोकांच्या मूलभूत कल्याणावर खर्च करायची वेळ आली की नेहमीच आर्थिक संसाधनांच्या कमतरतेचे निमित्त पुढे केले आहे. त्यांच्याकडे राष्ट्रीय असंघटित कामगार कल्याण कोषाला पुरेसा निधी देण्यासाठी आर्थिक संसाधने नाहीत! अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा, शालेय पोषण आहार कर्मचारी इत्यादींना नियमित करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. त्यांना किमान वेतन देण्यासाठी पैसे नाहीत. या लाखो गरीब महिलांच्या सेवांचा अनेक दशके वापर करून घेतल्यानंतर त्यांना म्हातारपणी सामाजिक सुरक्षा देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. ह्या कर्मचाऱ्यांना माणसासारखे नाही तर वापरा आणि फेकाच्या वस्तू असल्यासारखे वागवले जाते.     
कामगारांसाठी ज्या सरकारकडे पैसे नाहीत, त्यांच्याकडे बड्या देशी विदेशी कॉर्पोरेट्सवर बरसवण्यासाठी मात्र ढिगाने पैसे आहेत. गेल्या एक दशकापासून दर वर्षी सरासरी ४ ते ५ लाख कोटी रुपयांची करमाफी या कॉर्पोरेट्सवर उधळली जात आहे. या करमाफीच्या जोडीला दर वर्षी ४ ते ५ लाख कोटींचा थेट कर वसूल न करता सोडून दिला जातो. याचा अर्थ आहे, की दर वर्षी जवळ जवळ ८ ते १० लाख कोटींचे लाभ कॉर्पोरेट विभागाला दिले जातात! सरकार कुणासाठी काम करत आहे? कुणाच्या हितांचे रक्षण करत आहे? या देशाच्या संपत्तीचे निर्माण करणाऱ्या कामगारांच्या, त्यांच्या मुलांची म्हणजेच देशाच्या भावी मनुष्यबळाची काळजी घेणाऱ्यांच्या हितांचे की देशाच्या संपत्ती आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करणाऱ्या, आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची मोठमोठ्या रकमांची कर्जे बुडवणाऱ्या, कर बुडवून देशाच्या तिजोरीवर डल्ला मारण्याबरोबरच आपली कधीही न शमणारी नफ्याची भूक भागवण्यासाठी कामगारांचे प्रचंड शोषण करणाऱ्या कॉरेपोरेट्सच्या हितांचे?  
चला, संघटित होऊन संघर्ष करुया
कोणतीही कामाची सुरक्षा, उत्पन्नाची सुरक्षा किंवा सामाजिक सुरक्षा नसलेले आम्ही असंघटित कामगार अधिकारांसाठी लढत आहोत. आम्ही कमीत कमी १५००० रुपये वैधानिक किमान वेतन मिळावे यासाठी लढत आहोत. आम्ही म्हातारपणच्या पेन्शनसाठी, कामाच्या सुरक्षित आणि छळमुक्त ठिकाणासाठी, आरोग्य आणि मातृत्व लाभांसाठी, मुलांच्या संगोपनासाठीच्या व्यवस्थेसाठी, कामाच्या आणि जगण्याच्या चांगल्या परिस्थितीसाठी लढत आहोत. आमच्यापैकी अंगणवाडी कर्मचारी, आशा, शालेय पोषण आहार कर्मचारी आणि अन्य योजना कर्मचारी, कामगार म्हणून मान्यता मिळवण्याच्या अधिकारासाठी लढत आहेत.       
आम्ही आमच्या कामगार संघटनांमध्ये संघटित झालो तरच या अधिकारांसाठी लढू शकतो. सरकारला हे चांगलेच माहित आहे. सरकारला आम्हाला एकत्र येऊ द्यायचे नाही, संघटित होऊ द्यायचे नाही, कामगार संघटनांची बांधणी करू द्यायची नाही आणि लढूही द्यायचे नाही. म्हणूनच सरकारला फक्त संघटित क्षेत्रातील कामगारांनाच नाही तर असंघटित क्षेत्रातीलही काही विभागांमधील कामगारांना किमान काही सुरक्षा देणाऱ्या कामगार कायद्यांमध्ये बदल करायचा आहे, ज्यामुळे संघटित होणे एक अशक्यप्राय गोष्ट होऊन बसेल. कामगार कायद्यांमध्ये बदल केल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांची परिस्थिती सुधारेल असा खोटा प्रचार केला जात आहे. संघटित व असंघटित कामगारांमध्ये फूट पाडण्यासाठीच हे कारस्थान केले जात आहे. आत्ता अस्तित्वात असलेले अधिकारच जर काढून घेतले गेले तर नवीन अधिकारांसाठी लढणे आपल्यासाठी सोपे राहणार नाही हे काही सांगण्याची गरज नाही. आपल्याला खरोखरच जर अधिकार मिळवण्यासाठी लढायचे असेल तर जे कामगार अनेक वर्षे लढून मिळवलेले अधिकार शाबूत ठेवण्यासाठी लढत आहेत त्यांच्याबरोबर एकजूट करावीच लागेल. आपण सरकारच्या फोडा आणि राज्य करा या धोरणाला बळी पडता कामा नये. कामगार कायद्यांमध्ये बदल करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांकडे काणाडोळा करता कामा नये. कामगारांच्या काही विभागांचे सध्या अस्तित्वात असलेले अधिकार संपुष्टात येण्याचा अर्थ आहे, कामगारांच्या सर्व विभागांना नवीन अधिकार मिळवण्याची लढाई अजूनच जास्त कठीण होणार आहे. धादांत खोटा आणि निर्लज्ज अपप्रचार करून या देशातील लोकांना फसवण्याचे सरकारचे कारस्थान आपण हाणून पाडले पाहिजे. असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा लाभ देत असल्याचा भ्रम आपण फोडून टाकला पाहिजे. सरकारच्या कामगार विरोधी आणि कॉर्पोरेट्सच्या बाजूच्या धोरणाचा आपण पर्दाफाश केला पाहिजे, त्यांच्या विरोधात लढले पाहिजे आणि त्यांचा पराजय केला पाहिजे.    
याच उद्दिष्टांसाठी कामगार संघटनांच्या संयुक्त आंदोलनाने २ सप्टेंबर २०१५ रोजी देशव्यापी सार्वत्रिक संप करण्याचा निर्णय घेतला आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या संपूर्ण जनविभागाने व देशातील सुमारे १ कोटी योजना कर्मचाऱ्यांनी या संपात सहभागी झाले पाहिजे आणि हा संप प्रचंड यशस्वी करून सरकारला हा इशारा दिला पाहिजे की आम्ही सरकारला एका बाजूला भ्रामक अपप्रचार आणि त्याचवेळी कामगार वर्गाच्या मूलभूत अधिकारांवर व उपजीविकेवर हल्ला करू देणार नाही.
हा संप सरकारला इशारा देईल की संघटित असो वा असंघटित, या देशातील तमाम कामगार वर्ग, ह्या कामगार विरोधी, गरिबांविरोधी आणि देश विघातक धोरणांविरुद्ध निर्णायक लढा देईल आणि ती मागे घेईपर्यंत शांत बसणार नाही.